ग्रामगीता अध्याय 37

आत्मानुभव

॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥

’ अनुभव ’ ऐसा शब्द ऐकला । त्यावरि श्रोत्यांनी प्रश्न पुसला । आत्मानुभवाचा मार्ग सांगितला । पाहिजे आम्हां ॥१॥ 

केले प्रयत्न तुम्हीं कोण ? कैसें गेलें तुमचें जीवन ? खरी आत्मानुभवाची खूण । काय आहे ? ॥२॥ 

मित्रांनो ! ऐका सावकाश । प्रत्येक जीव देवाचा अंश । आपुल्या कर्तव्यें पद त्यास । प्राप्त होय हवें तें ॥३॥ 

करणी करितां विवेकें पूर्ण । नरचि होय नारायण । प्रारब्ध आणि परिस्थिति जाण । वाट देई तयासि ॥४॥ 

ज्यासि करूं आवडे उन्नति । निसर्ग होई ग्रंथ त्याप्रति । साधन होई एकेक वृत्ति । जाणत्यासि ॥५॥ 

आधि पाहिजे सुंसंस्कार । पुढे जाण्याचा निर्धार । संत, ग्रंथ काय, अवघाचि संसार । सहायक होई तयासि ॥६॥ 

बुडतें जग त्यासि जागवी । संकटें स्फूर्ति देती नवी । अघातांतूनि हितचि भावी । साधक तो ॥७॥ 

मनीं आत्मोन्नतीची तळमळ । त्यासि वाट देती सकळ । आपुलें आपणांतचि बळ । पाहिजे आधी ॥८॥ 

सत्य संकल्पाचा निश्चय । लावी जीवनासि सोय । वाट चालतां निर्भय । मुक्काम पावे ठायींच ॥९॥ 

आपुल्या अंगीं प्रकाश भरला । तो पाषाणचि हिरा ठरला । खाणींत शोधूनि आणिती त्याला । प्रयत्नें जन ॥१०॥ 

मृगनाभीची कस्तुरी । ती स्थान पावे राज-शिरीं । कमल चढे देवावरि । चिखलीं जन्मूनि स्वगुणांनी ॥११॥ 

हाचि अनुभव प्रमाण । यत्नाअंगींच देवपण । हें संतग्रंथांचें सत्यचि कथन । जाणावें श्रोतीं ॥१२॥ 

तुम्हीं विचारिलें माझें जीवन । म्हणोनि करितों थोडे कथन । जनासह आपण जनार्दन । हीच खूण अनुभवाची ॥१३॥ 

हीच अनुभवावयासाठी । सर्व कराव्या आटाआटी । ऐसेंचि प्रत्यया येई शेवटीं । साधकाच्या ॥१४॥ 

देवत्वाची ज्योत दीप्तिमान । परि आवरण पडलें मलीन । तें साफ करावयासीच प्रयत्न । म्हणती साधन त्यालागी ॥१५॥ 

ऐसीं साधनें निमित्तमात्र । स्वरूप एकचि असे सर्वत्र । तें अनुभवा आणी वृत्ति पवित्र । हेंच सूत्र उन्नतीचें ॥१६॥ 

या उन्नतिमार्गी जो लागला । विवेकें अंतरीं जागला । तो स्वयें उध्दरोनि गेला । तारक झाला जनांसि ॥१७॥ 

हें प्रयत्नाचें शुध्द महिमान । ऐकोनि मींहि केलें साधन । तें कळाया करितों  वर्णन । थोडकेपण आयुष्याचे ॥१८॥ 

लहान ऐशा गांवामाजीं । मागासलेल्या जनसमाजीं । उपासाचीच लाभे रोजीं । ऐशा ठायीं जन्मलों ॥१९॥ 

घरीं दारिद्रयाचें वरदान । परि भावभक्तीची नसे वाण । ऐकत सुसंस्कारांचें गान । सोशीत कष्ट वाढलों ॥२०॥ 

अंतरीं जिज्ञासा असे खूप । ती घरी हूडपणाचें रूप । अल्लडपणें साहोनि ताप । सर्वांमाजी वावरलों ॥२१॥ 

ऐकिलें श्रवणीं थोडें कीर्तन । त्यावेळीं होतें आर्तपण । धृवप्रल्हादाचें आख्यान । मना वाटे ऐकावें ॥२२॥ 

कांही ऐकिली संतचर्चा । कांही कथां  ऐंकिल्या पुरानीच्या । कांही वाढविल्या भावना मनाच्या । वैराग्ययोगें ॥२३॥ 

झाली परिस्थितीहि कारण । धरावया एकान्तीं मुद्राध्यान । तें सर्व केलिया कथन । वेळ पुरेना वर्षाचा ॥२४॥ 

महत्त्वाचेम सांगावें वाटतें । साधकाला मिळेल आइते । आत्मानात्म-विचार येथे । श्रोते ऐकती म्हणोनि ॥२५॥ 

कांही संगतीचें लाभलें फळ । आलें आत्मचिंतनासि बळ । देवदर्शनाची खळबळ । झाली हृदयीं दृढ ऐसी ॥२६॥ 

पुढे कल्पना सरसावली । धृवानेच कां तपस्या केली ? आपणासहि कां न घडली । पाहिजे तैसी ? ॥२७॥ 

काय करावें वाटे मनीं । कैसें ध्यान करावें नेत्र लावोनि । कोणा विचारावें, समाधानी । वृत्ति व्हाया जीवाची ? ॥२८॥ 

मग बळेंचि रानीं जावें । वृक्षाखाली ध्यान धरावें । कधी मूर्तिपूजनचि करावें । मंदिरामाजीं ॥२९॥ 

कधी रेणुकांची करावी मूर्ति । वनपुष्पपत्रें पूजावी ती । भजन करावें अहोरातीं । तन्मय चित्त करोनिया ॥३०॥ 

ऐसा वाढला प्रेमनिश्चय । मानसिक संकल्पांचा समुच्चय । धरिली ध्यान-मुद्रेची सोय । एकांतामाजीं ॥३१॥ 

परि झालें नाही समाधान । चित्त उडे मधून मधून । तशांतचि करावें कीर्तन । तळमळोनि ॥३२॥ 

आपणचि मना समजावावें । आपणचि समाधान मानावें । गावें नाचावें बोलत जावें । आपल्याशींच एकान्तीं ॥३३॥ 

परि प्रारब्धभोग आडवा पडे । विषयांकडे वृत्ति ओढे । कधी दुष्परिणाम घडे । देह-धारणेने ॥३४॥ 

म्हणोनि निघालों घर सोडून । बावळट ऐसा वेष घेऊन । कधी कधी विसरों देहभान । चिंतेंत देवदर्शनाच्या ॥३५॥ 

राहिलों वनीं, घोर रानीं । रानवट लोकीं, धनिकाभुवनीं । अनेक अनुभव आले जीवनीं । स्फुरले मनीं सदभाव ॥३६॥ 

कांही योगाचें साधन । थोडें अध्यात्म-वाचन । विशेष विश्वनिरीक्षण । केलें मनन सर्वकाळ ॥३७॥ 

भजन, सप्ताह, यज्ञयाग । महोत्सव, व्रतें, महाप्रसंग । नाना कार्यें, साधनप्रयोग । असंख्य केले ॥३८॥ 

केलें बहुत पर्यटन । वनभ्रमण तीर्थाटन । पाहिले सर्व प्रांत फिरून । आयुष्यांत ॥३९॥ 

नाना मंदिरें, देवालयें । संस्था, आश्रम, वाचनालयें । दरीं कंदरीं होऊनि निर्भय । पाहिलीं स्थानें ॥४०॥ 

भेट घेतली वरिष्ठांची । पाहिली भिन्नता रीतिरिवाजांची । रुचि घेतली खाण्यापिण्याची । देशीं-भेंषीं ॥४१॥ 

पाहिले अखाडे साधुजनांचे । गोसाव्यांचे, संन्याशांचे । वैराग्यांचे, महानुभवांचें । वारकर्‍यांसहित ॥४२॥ 

प्रवास केला बैलगाडीचा । घोडे, टांगे, हत्ती-अंबारीचा । सायकल, मोटार, विमानाचा । सर्वकाही ॥४३॥ 

पाहिले सागर, भव्य स्थानें । सातपुडा सह्याद्रि विंध्याद्रि, रानें । हिमालयासहित अति उंचपणें । गगनभेदी ॥४४॥ 

निसर्गाचीं दृश्यें अपूर्व । मानवकृत चमत्कार-वैभव । सुखसाधनें ज्ञानसाधनें सर्व । पाहिलीं लोकीं ॥४५॥ 

हें सर्वकांही पाहूनि पूर्ण । नाहीच झालें  शांत मन । शेवटीं घ्यावा लागला अनुभव जाण । आपणामाजीं ॥४६॥ 

बहिर्मुख दृष्टीने पाहतां । समाधान न लागे हातां । हीच असे अनात्मता । दु:खदायी सर्वांसि ॥४७॥ 

विश्व कोण मी कोण ? यांचें मुळांत एकपण । तें जाणतां विचारें पूर्ण । अंतर्मुख वृत्ति होय ॥४८॥ 

एकचि तत्त्व चैतन्यघन । सागरीं बर्फ-तुकडयांसमान । त्यावरि सजलें विविधपण । हीच खूण अनुभवाची ॥४९॥ 

मीच आहे सकळांस कारण । माझ्याच आत्म्याचें हें विशालपण । ओळखी होतां कळलें पूर्ण । अद्वैतपण सर्वांचें ॥५०॥ 

मग मुरली पाहण्याची हौस । निवांत झालों सावकाश । जें जें दिसे या  दृष्टीस । तें तें भासे आपणचि ॥५१॥ 

वाटे सर्वचि येथे आमचे । भिन्न कोण निवडायाचे ? हर्ष न समाये, मनाचें । मोठेपणीं आतलाचि ॥५२॥ 

मुंगी आणि ऐरावत । अणुरेणु आणि मेरूपर्वत । सर्व माझेचि संकल्प मूर्त । कळों आलें ॥५३॥ 

अजूनि कितीतरी आत्मा थोर । न चाले मोजमाप अनिवार । अनंत ब्रह्मांडें विश्वाकार । संचले असती ॥५४॥ 

माया, ईश्वर, ब्रह्म, सृष्टि । सर्व आत्मरूपाचिया पोटीं । पोटपाठहि नाही शेवटीं । तेंचि तत्त्व मी ॥५५॥ 

ब्रह्म म्हणती सर्वांत मोठें । परि ही भाषा परकी वाटे । अनुभव घेतां वेगळें न भेटे । ब्रह्मपण आटे आपणांत ॥५६॥ 

प्रथम गांव-मंदिर मोठें वाटलें । मग तीर्थाटन मोठें झालें । आणि पुढे निसर्गरूप दिसूं लागलें । मोठें मोठें ॥५७॥ 

परि त्याच्या मुळाचा अनुभव घेतां । मोठा कळलाच नाही कोणता । हा आत्म्याचा विलासचि तत्त्वता । अनुभवा आला ॥५८॥ 

मोठा तो पंचतत्त्वादि भेदोनि । लहान तोचि अणुरेणूहूनि । पाहतां पाहणें दुरी सारोनि । कळला एकपणीं जवळचि तो ॥५९॥ 

तेथेचि झालें पूर्ण साधन । मग दिसों लागलें एकचिपण । सुखदु:ख आणि जन्ममरण । सारिखेंचि ॥६०॥ 

भिकारी आणि धनवान । हे तों संकुचित भावें दोन । विकास होतां न राहती भिन्न । होती समान उन्नत ॥६१॥ 

नाही जातिपंथादि भेद । आपपरभाव हर्षखेद । प्रकट होई सच्चिदानंद । सर्व ठायीं समरूपें ॥६२॥ 

जन्मणें मरणें झाला खेळ । सुखदु:ख सर्व झालें शीतळ । संकटें येतां वाटे प्रेमळ । प्रवाह आला ॥६३॥ 

आता विषादचि नाही उरला । विचार विस्ताररूपें व्यापला । जें जें करणें असेल निसर्गाला । रुचि वाटे तयाची ॥६४॥ 

यासीच खरा बोलती प्रारब्धवाद । ज्यांतूनि आसक्तीचा उच्छेद । इच्छेविरहीत आनंद । सर्वांसाठीं निर्विषय ॥६५॥ 

नाही शृंगार सौंदयाचा । नाही पाल्हाळ काव्यकलांचा । जें असेल जैसें तयाचा । आनंद वाटे चित्तासि ॥६६॥ 

हें सर्व कासयाने झालें ? यासाठी काय साधन केलें ? कासयाने द्वैतपण मुरलें । आपणामाजीं ? ॥६७॥ 

हें आठवतां भान येतें । साक्षित्वरूपें पाहतां कळतें । अंतरंगीं विचारितां वळतें । कार्यमर्म सर्वकांही ॥६८॥ 

बुध्दीसि स्वातंत्र्य दिलें । जैसें जें दिसलें तें विचारिलें । त्यापरी कार्यसंबंध जोडले । आत्मत्व आलें देहभावा ॥६९॥ 

आपण तैसे सकळ जन । मग कासया मानावें भिन्नपण ? 

ऐसा होतां झालें सावधान । ज्ञानमार्ग सर्वकांही ॥७०॥ 

ऐसा जीवेंचि मंत्र धरिला । न कळे कोणीं वरदहस्त ठेविला । परि सदभावें मीं नमस्कारिला । आडकोजी गुरुस्थानीं ॥७१॥ 

बहिरंग बोध नाही केला । स्वयेंचि श्रध्दाभावें घेतला । अहंकार न हो म्हणोनि पूजिला । सदगुरुराजा ॥७२॥ 

परि अंतरीं कळलें मर्म । गुरुशिष्यपण आहे भ्रम । आहे एकचि वस्तु अगम्य । दोघांमाजीं ॥७३॥ 

हें कळावयासि संगति लागे । संगतियोगें भावना जागे । भावना जागतां अंतरंगें । दिसे मुळींचें आत्मरूप ॥७४॥ 

मग जें जें मागे पाहिलें । तें तें सर्व सहज झालें । स्वाभाविकपणचि अंगीं आलें । स्वरूपानुभवें ॥७५॥ 

स्वरूप म्हणजे अखंड स्थिति । जी आत्म्याची सहजगति । नाही कृति ना विकृति । स्वरूपामाजीं ॥७३॥ 

अखंड प्रेम अगाध ज्ञान । अबाधित सत्य आनंद पूर्ण । हेंच स्वरूपाचें लक्षण । अवीट अभिन्न अक्षय जें ॥७७॥ 

परि हें प्रथम कळलें नव्हतें । म्हणोनि धुंडिलें स्थानमानातें । नवल तोंवरि वाटलें होतें । न लक्षितां स्वरूपस्थिति ॥७८॥ 

जैसी जैसी जाणीव वाढवी । तैसी शक्ति व्यापक झाली । पुढे वाटली पर्वतावलि । गोवरी जैसी ॥७९॥ 

राजाहि वाटला घरचा गडी । सुचवावयाची झाली तातडी । संसार झाला आपुला सवंगडी । याचि गुणें ॥८०॥ 

आपुला आनंद पैसावला । सुखवूं पाहे दु:खिताला । निद्रेत कोणी ओसणला । तरी ये दया त्याची जैसी ॥८१॥ 

परकेपणाची दृष्टीच गेली । वासना भावनेंत विरूं लागली । दुसर्‍यांचीं सुखदु:खें झालीं । आपणाऐसीं सहजचि ॥८२॥ 

मग माघारलीं पूजामंदिरें । दिसूं लागलीं जिवंत शरीरें । यानेच दिसे सर्वांचें बरें । देवकृपा व्हावयासि ॥८३॥ 

जिकडे जिकडे उणीव भासे । तिकडे तिकडे मन उल्हासें- । धाविनो करी आपणाऐसें । एकचि अंग समजोनि ॥८४॥ 

जंव अंतरीं आत्मा कळला । तंव आपल्यांतचि विश्व पाहों लागला । जैसा दिव्यदृष्टीचा प्रकाश गवसला । अर्जुनालागी ॥८५॥ 

मग अनंत उदरें अनंत हस्त । दिशा व्यापूनिया समस्त । दिसे विराटरूप महासमर्थ । ठायींच्या ठायी ॥८६॥ 

ही दृष्टि सर्वांसचि आहे । परि विचारें उघडील तोचि पाहे । तो अनुभवमार्ग सांगती लवलाहें । संतसज्जन ॥८७॥ 

जैसे आकाशाचे तुकडे नोहे । ते घटोपाधीमुळेचि भासती पाहे । तैसा जीव अल्पज्ञ वेगळा न राहे । अनुभव घेतां ॥८८॥ 

नुरे जीवाचें जीवपण । दारिद्यदु:ख रंकपण । आनंदाचें शिखर पूर्ण । प्राप्त होई निश्चयें ॥८९॥ 

मग प्रारब्ध तयाचा खेळ । प्रयत्न लीलारूप केवळ । आत्मरूपें विश्व सकळ । अनुभवा ये एकपणें ॥९०॥ 

जीव आपुली वारी व्यथा । तैसाचि सुखवी जगा समस्ता । उरला उपकारापुरता । सर्वांचिया आत्मभावें ॥९१॥ 

त्यासि नाही उरली कामना । निष्काम कर्म त्याचा बाणा । मग बाधक होईल कोणा । कैशापरी संसारीं ? ॥९२॥ 

तो जें करी तें ईश्वरपूजन । बोलेल तेंचि वेदवचन । त्यांच्या शब्दें आंदोलन । करिती जन सदभावें ॥९३॥ 

सत्तेविण त्याची सत्ता । क्रांतीहूनि सेवेची महत्ता । इशारा होतां मालमत्ता । लोक लाविती सत्कार्यीं ॥९४॥ 

त्याच्या संदेशाचें बळ । गांवीं करी प्रेमाचा सुकाळ । सुखी होती लोक सकळ । गांवोगांवींचे ॥९५॥ 

त्याच्या ज्ञानें भारले अज्ञजन । ते ज्ञानियांसि देतील शिकवण । झुंजती काळाशीं दारूण । स्त्रिया मुलेंहि ॥९६॥ 

हें आत्मविकासाचें बळ । मानवी प्रयत्नाचेंचि फळ । देव होवोनि करील सकळ । लोकचि देव ॥९७॥ 

मित्रा ! ऐसा अभ्यास करि । धरोनि मार्ग-बोध अंतरीं । मग दिसेल याच शरीरीं । तो श्रीहरि व्यापला ॥९८॥ 

लाभतां अनुभवाची खूण । जनता होईल जनार्दन । गांवीं ऐसा एकटाहि जाण । उन्नत करी गांव सारें ॥९९॥ 

तो प्रलोभनीं कोठे फसेना । रागद्वेषेंहि गोंधळेना । त्याच्या सहवासेंचि ग्रामजीवना । अमृत लाभे ॥१००॥ 

ऐसा सेवकचि पाया जगाचा । गांवचा रत्ननिधिच तो साचा । अभ्यास करा सक्रिय अध्यात्माचा । याचसाठी ॥१०१॥ 

प्रयत्नें मानव होई देव । प्रयत्नें स्वर्गतुल्य होई गांव । संतांच्याहि अभेदभक्तीचें वैभव । ग्रामसेवा-प्रयत्नीं ॥१०२॥ 

ऐसे लोक निर्माण करावे । तरीच उदया ये जग नवें । नांदेल ग्राम, विश्व, वैभवें । सर्वकाळ तुकडया म्हणे ॥१०३॥ 

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्रस्वानुभव संमत । स्वानुभवें कथिला अध्यात्मपथ । सदतिसावा अध्याय संपूर्ण ॥१०४॥ 

॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥

*

” जगत्पति परमेश्वराने मनुष्यासाठी लोकर, रेशीम व कापूस निर्माण केला, त्याचीं वस्त्रें तुम्ही अवश्य वापरा; पण त्या सर्वांहून पवित्रतेचें वस्त्र मानवास अधिक शोभून दिसतें. ” 

—महात्मा महंमद पैगंबर