ग्रामगीता अध्याय 11

ग्राम रक्षण

॥ श्रीगुरुदेवाय नम: ॥

 

ईश्वरसेवाचि गांव-सेवा । तो सर्वांच्याचि सुखाचा ठेवा । परि कांही असुरहि असती गांवां । यज्ञभंग करावया ॥१॥ 

 

एका सज्जनें प्रश्न केला । गांवीं बाग फुलूं लागला । परि दुष्ट लाविती आग त्याला । काय उपाय नित्यासाठीं ? ॥२॥

 

आम्हीं केली संघटना । निवडोनि आणिलें सज्जना । परंतु दुर्जनापुढे बनेना । कांही केलें तरीहि ॥३॥

 

त्यांना दावा आदर्श जीवन । अथवा प्रचारें द्या पटवून । किंवा सेवा रात्रंदिन । करा त्यांची हवी ती ॥४॥

 

परंतु ते न जुमानिती । उपदेश देतां उलटे चिडती । कार्यकर्त्यांसि हाणूनि पाडिती । पदोपदीं अडवोनिया ॥५॥

 

चांगल्यातूनहि काढिती वाईट । हवा फैलाविती रोगट । सज्जनांवरि आणिती संकट । कारस्थानें करोनि ॥६॥

 

कमलकसाई बोलभांड । मुडदेफरास गांवगुंड । कज्जेदलाल धनाढय धेंड । हातीं तयांच्या ॥७॥

 

सत्तेचाहि पाठिंबा सतत । घेवोनि आणिती पेचांत । बसली लोकांना त्यांची दहशत । सांगा काय करावें ? ॥८॥

 

मित्रा ! जो जो जेयीचा रोग । तेथेचि त्याची औषधि सांग । योजकचि पाहिजे कराया उपयोग । कुशलपणाने ॥९॥

 

सत्य पडताहे कमजोर । म्हणोनीच असत्य होई शिरजोर । यास्तव सत्यासि करावें कठोर । सामर्थ्यशाली सेवेसाठी ॥१०॥

 

सत्याचें बळ वाढेल कैसें । तेंहि सांगतों ऐका शांतसे । सज्जनांनी न बसावें आळसें । अथवा हताश होवोनि ॥११॥ 

 

लोकांचिया मनीं जरी दहशत । तरी तुमच्यासारिखेचि कांही त्यांत । असतील हृदयीं तळमळत । चांगलें व्हावें म्हणोनि ॥१२॥

 

ऐसी ज्यांना ज्यांना आवडे सेवा । जे सत्याचा जपती ठेवा । त्या लोकांचा करोनि मेळावा । सक्रिय संघटन वाढवावें ॥१३॥

 

जनतंत्राचा हा काळ । शक्ति लोकांअंगींच सकळ । जनतेच्या निश्चयाचें बळ । साम्राज्यासहि नमवूं शके ॥१४॥ 

 

हत्तीस आवरी गवती दोर । मुंग्याहि सर्पासि करिती जर्जर । व्याघ्रसिंहासि फाडिती हुशार । रानकुत्रें संघटोनि ॥१५॥

 

संघटनेने काय नोहे ? । बिंदू मिळतां सिंधुपणा ये । गांवचा बाग बहरोनि जाय । फुलाफळांनी संघटनेच्या ॥१६॥ 

 

ग्रामसुधारणेचा मूलमंत्र । सज्जनांनी व्हावें एकत्र । संघटना हेंचि शक्तीचें सूत्र । ग्रामराज्य निर्माण करी ॥१७॥

 

गांव करी तें राव न करी । ऐसें सांगोनि ठेविलें चतुरीं । जरी दाद न घेतील अधिकारी । तरी गांव तय सुधारूं शके ॥१८॥

 

यासाठीच पाहिजे सशक्त संघटन । जें करी अन्याय-निर्मूलन । देवोनिया न्यायदान । करी रक्षण गांवाचें ॥१९॥ 

 

संघटन गांवीं मजबूत असावें । आपापलें दु:ख त्यासि सांगावे । कोणावरि अन्याय होऊं न द्यावे । कार्य संघटनेचें ॥२०॥

 

त्यासाठी मिळोनि लोक नेमावे । जे असतील इमानी बरवे । त्यागी निर्भय, चरित्र असावें । उज्जल ज्यांचें ॥२१॥ 

 

गांवाचे जे पवित्र सेवक । तेचि प्रसंगी होती सैनिक । ज्या गांवी ऐसे सावध पाईक । तेथ विघ्न न ठाके ॥२२॥

 

कांही अपराध घडतां गांवांत । त्वरित कळवावी खबरमात । सर्वांनी भाग घेवोनि त्यांत । ठीक करावें बिघडेल तें ॥२३॥ 

 

गांवचा प्रत्येक सज्ञान । यांचें असावें सहकार्य पूर्ण । हांक देतां सर्वजण । जमोनि यावेत एकत्र ॥२४॥ 

 

एकाने कोणी गुन्हा केला । शहाणपण सांगावें सकळांनी त्याला । गुन्हेगार ऐकेनासा झाला । शिक्षा द्यावी गांवाने ॥२५॥ 

 

जेथे समजदार प्रलोभनीं पडला । सोंग करोनि घोरूं लागला । चिमटे घेवोनीच त्याला । उठविलें पाहिजे ॥२६॥

 

कोळसा साबूने धुवा उगाळा । परि तो शेवटवरि काळा । अग्निसंस्कारी जळतां उजाळा । येई त्यालागी ॥२७॥

 

म्हणोनि बहिष्कार असहकार । करोनि त्याचे तोडावे आधार । नाक दाबतां तोंड सत्वर । उघडों लागे ॥२८॥ 

 

ऐसी सर्वांनी पाठ पुरवावी । जो कोणी गांवास बिघडवी । ऐकेनासा होतां सत्ताप्रभावीं । मुक्त करावा गांवांतूनि ॥२९॥ 

 

उत्तमांचाचि संग्रह बरवा । वाईटाचा निषेध करावा । जराहि पनपूं न द्यावा । वृक्ष वाईटाचा ॥३०॥

 

सर्वांनी झटावें यासाठी । करावी लागेल ती आटाआटी । प्राण गेला तरी संकष्टीं । सहन करावें सेवेस्तव ॥३१॥

 

ऐसी असावी गांवाची तयारी । तरीच गांव बनेल स्वर्गपुरी । नलगे सत्ताधीशांची तुतारी । पाठीमागे ॥३२॥

 

ऐसा होतां आचार-विचार । गांव होईल न्यायभांडार । जागृत असतां सज्जन चतुर । सेवेसाठी ॥३३॥

 

ऐसें जें जें गांव वागलें । त्या गांवाचें भाग्य उघडलें । नाहीतरि टक्केटोणपे आले । नशिबीं त्याच्या ॥३४॥

 

हें ऐकोनि एक बोलला । म्हणे तुम्ही शांतीचा पुरस्कार केला । आणि तुम्हीच ससेमिरा लाविला । दुराचार्‍यांपाठीं ॥३५॥

 

सज्जन आणि दुर्जन । सर्वांत सारखाचि भगवान । एकासि देतां दंड धावोन । तेव्हा सेवा कुठे राहे ? ॥३६॥ 

 

दया क्षमा आणि शांति । हीच सात्विकाची संपत्ति । निष्ठुरपणें दंडावें विरोधकांप्रति । हें सज्जनपण कशाचें ? ॥३७॥ 

 

ऐका ऐसी विचारसरणी । ऐकोनि भुलूं नये कोणी । तारतम्यचि ठेवोनि मनीं । गांव सुधारावें विचारें ॥३८॥ 

 

काय केलें म्हणजे होतो सज्जन । याचें आहे मोजमाप जाण । हें प्रथमक्षणींच ओळखोन । हुशार व्हावें गांवाने ॥३९॥

 

सेवा द्यावी कोणे ठायीं । हें तारतम्य असावें हृदयीं । याची दृष्टि ज्यांस नाही । होतील फजीत ते प्राणी ॥४०॥ 

 

ज्यासि करणें चोरबाजार । त्यासहि नोकर पाहिजे इमानदार । त्यासि देतां सेवा सुंदर । पुण्य लाभेल कोणासि ? ॥४१॥ 

 

साधुसंतें जनसेवा केली । परि सत्यासाठीच काया झिजविली । कधी आसचि नाही ठेविली । राजेरजवाडयांची ॥४२॥.

 

जगीं अनंत राजे झाले । परि सर्वचि नाही पूजिले । संतसज्जनचि देव मानले । हृदयमंदिरीं तयांनी ॥४३॥ 

 

म्हणोनि कोणी कोणास सेवा द्यावी । हेचि प्रथम दृष्टी यावी । मग सेवेसाठी उडी घ्यावी । हाचि धर्म मानवाचा ॥४४॥

 

सदैव दया असावी चित्तीं । मनास परोपकाराची प्रीति । राहूं न द्यावी उणीव कोणती । दिसतां कोठे ॥४५॥ 

 

क्षमाशांतिमय हृदय । विश्वासूपणाचें वर्तन निर्भय । प्राण गेलियाहि निर्दय । न व्हावें आम्ही ॥४६॥ 

 

परि जेथे निर्दयपण हवें । तेथे दगडापेक्षाहि कठिण व्हावें । हेंहि सांगणें लक्षांत घ्यावें । तारतम्याने ॥४७॥

 

नाहीतरि दया केली । उलट आपुल्यासचि  भोवली । जिने गांवाची नासाडी झाली । नव्हे ती दया ॥४८॥ 

 

भिकार्‍यास भीक दिली । त्याने दारू-गांजांत उडविली । सांगा काय दया घडली । ऐशियापरीं ? ॥४९॥ 

 

कांही चोरटे गांवीं फिरती । दिवसां साधुवेष घेती । रात्रौ तेचि डाका मारिती । वेषभूषा बदलोनि ॥५०॥ 

 

ते लोकांनी सहन करावें । साधु म्हणोनि सोडोनि द्यावें । ऐसे दयेचे वेडे गोडवे । गाऊं नयेत वीरांनी ॥५१॥

 

दयाधर्म दानधर्म । यांचें ओळखावें वर्म । वेडयापरी न करावें कर्म । पोषक आळसा विकारा ॥५२॥

 

एरव्ही संसार सोडोनि बुवा झाले । दारोदारीं भिकेसि लागले । सदाचार सर्व बुडविले । ऐसे झालें याच गुणें ॥५३॥.

 

कष्ट नाही करणें अंगीं । नाही संग्रहाचे खरे त्यागी । वेष घेवोनि फिरती ढोंगी । नांव बुडवाया संतांचें ॥५४॥

 

यांना दानधर्म द्यावे । तरि सर्व पापांसि स्थान मिळावें । म्हणोनि तारतम्य ठेवावें । दानधर्मियाने ॥५५॥ 

 

गांवीं मागती माधुकरी । खुशाल खेळती फिचर जुगारीं । दारूगांजा भांग पोरी । गुप्त राखती मठामाजी ॥५६॥ 

 

ऐशा लोकां दान द्यावें । गांव बुडवावें, बदनाम व्हावें । ऐसा धर्म कोणत्या देवें । सांगितला सांगा ? ॥५७॥

 

दया हें मुख्य धर्मलक्षण । परि दया म्हणजे प्राण्यांचें पालन । आणि कंटकांचें निर्दालन । बोलिलें संतीं ॥५८॥

 

सज्जनांचें संरक्षण । आणि दुर्जनांचें दमन । हेंचि अवतारांचेंहि कार्यलक्षण । न्यायसंगत ॥५९॥

 

म्हणोनि गांवीं कोणी अन्याय केला । दु:ख दिलें कोणा गरिबाला । त्याचा प्रतिकारचि पाहिजे झाला । गांवामाजी ॥६०॥

 

नाहीतरि गुंडांस फावे । सुटती जैसीं स्वैर गाढवें । दुष्टासि दया करोनि सोडोनि द्यावें । नव्हे हा धर्म ॥६१॥ 



अन्याय होतां प्रतिकारचि करावा । प्रथम अन्याय समजूनि घ्यावा । निश्चित कळतां आवाज द्यावा । संघटनेचा ॥६२॥ 

अन्याय नाना तर्‍हेचे असती । कांही धनाचे मानाचे दिसती । कांहींनी वाढे व्यसन अनीति । लोकांमाजी ॥६३॥

 

त्या सर्वांतूनि मार्ग काढावा । गांवीं दुराचार होऊं न द्यावा । हाचि खरा धर्म ओळखावा । विचारवंताने ॥६४॥

 

न्यायाचा कांटेकोरपणा । भिनावा आपुल्या हृदयीं जाणा । एका बाजूने दयेचा बाणा । दुसर्‍या बाजूने न्यायदंड ॥६५॥

 

हेंचि खरें मानवाचें लेणें । उगीच आहे सोनें मिरविणें । अंगीं वीरता नसतां मरणें । चोराहातीं ॥६६॥

 

कांहीलोक भोळे असती । आपुलें मानव्यभूषण खोविती । लोक त्यांसीच सात्विक म्हणती । वेडयापरी ॥६७॥

 

ज्यास करवेना ब्रीदाचें रक्षण । नाही अंगीं न्यायाचें भूषण । तो कैसा सात्विकजन । म्हणावा आम्हीं ? ॥६८॥

 

जो चोरांनी नागवावा । गुंड लोकांनी फसवोनि द्यावा । परस्त्रियेने भोंदवावा । तो सात्विक कैसा ? ॥६९॥ 

 

तोंडावरची न उडवी माशी । दच्के पाहतांचि पोलिसासि । न कळे आपुला हक्कहि ज्यासि । सात्विक त्यासि म्हणों नये ॥७०॥ 

 

त्यास म्हणावें दुबळा प्राणी । भित्रा विकासहीन अज्ञानी । ज्यांत नाही पुरुषार्थाचें पाणी । रक्षणासाठी ॥७१॥

 

त्यास कोणीहि उचलोनि न्यावें । दारूगांजादिक पाजोनि द्यावें । त्याने भोळा म्हणोनि पिऊनि घ्यावें । वारे भोळा ऐसा ॥७२॥ 

 

हा तो निर्बुध्दसा पाषाण । उत्तम वागण्याचें नाही ज्ञान । गंभीर शांत म्हणती जन । मुकामैंद म्हणोनिया ॥७३॥

 

खरा शांत तोचि नेमाने । जो न फसे कोणाच्या फसविल्याने । कधीहि चकाटया पिटणें ज्याने । पाहिलें नाही ॥७४॥

 

परनिंदा नावडे ज्यासि । परदु:ख न पाहवे डोळयांसि । धांवोनि जाय अडल्या-पडल्यासि । सहकार्य द्याया ॥७५॥



उगीदुगी ऐकतां कानीं । लगेच जाय तेथोनि उठोनि । लोकां सांगे उगीच बोलणीं । बोलूं नयेत ॥७६॥

 

कोणाची लपोनि टीका न करी । बोलणें ज्याचें तोंडावरि । निर्भय निर्मळ अंतरीं । स्फटिक जैसा ॥७७॥ 

 

गंदेपणा मुळीच नावडे । सुजनांचे गातो सदा पवाडे । सत्संगतीसि जीव धडपडे । सदैव ज्याचा ॥७८॥ 

 

सर्वांशीं बंधुत्वाचें वागणें । मन-मिलाफ संपादणें । लोकसंग्रह कुशलतेने करणें । जागृतीसाठी ॥७९॥ 

 

सुखीं अहंकारें न चढावें । संकटीं घाबरोनि न जावें । न्यायाने वागावें वागवावें । सर्व जना ॥८०॥ 

 

हें ज्यांनी अंगीं बाणविलें । तेचि शांतसात्विक बोलिले । तयांनीच गांवाचें हित झालें । समजतों आम्ही ॥८१॥

 

याऐवजीं दुबळेपण आलें । तरि गांवचि मग विलया गेलें । सांभाळितां न जाय सांभाळिलें । कोणाकडोनि ॥८२॥ 

 

म्हणोनि पाहिजे न्यायनिष्ठुरता । दयेमाजींहि तारतम्यता । उन्नति करील तीच सेवा तत्त्वता । हरप्रकारें ॥८३॥

 

द्वेष न करितां दुर्जनदमन । हें त्यांच्याहि उन्नतीसचि कारण । डॉक्टरें करावें अवयवच्छेदन । ती दयाचि तयाची ॥८४॥ 

 

सर्वाभूतीं परमेश्वर । त्यासि बाधक नसे सत्यव्यवहार । करावें संघटनेने गांव सुंदर । ही पूजाचि तयाची ॥८५॥ 

 

सर्वाभूतीं प्रेमभाव । वाढवावा गुणगौरव । दूर सारोनि उपद्रव । गांवचे आपुल्या ॥८६॥

 

’ जग तरि आम्हां देव । परि हा निंदितों स्वभाव ’ । म्हणोनि गुंडांसि आणिला खेव । संत तुकारामांनी ॥८७॥

 

’ हरिभक्त राहती जेथे । परचक्र यावें कैसें तेथे ? ’ ऐसें म्हणोनि लाविला पणातें । जीव त्यांनी ॥८८॥ 

 

आपुले वारकरी भाविक । तेचि वारकर्ते पाईक । करोनि दुष्टांसि  लाविला धाक । शिवाजीच जणुं सर्वहि ॥८९॥

 

तीच घेवोनि प्रेरणा । गांवी उभारावी न्यायसेना । जेणें कांही नुरे धिंगाणा । गांवीं आपुल्या ॥९०॥

 

दारू गांजा भांग अफीम । जुगार वेश्यादि वाईट काम । यांचें उरूं न द्यावें नाम । आपुल्या गांवीं ॥९१॥ 

 

त्यासाठी गांवच्या कांही सज्जनांनी । लागावें व्यसन-निर्मूंलनीं । उत्तम गुणांच्या अनेक श्रेणी । वाढवाव्या गांवीं ॥९२॥   

 

गांवचे चार सज्जन मिळोनि । अनिष्टप्रथा बंद कराव्या त्यांनी । ज्याने गांवास पावे नुकसानी । न ठेवावें तें ॥९३॥

 

कांही उन्मत्त शेतकरी । टोचती बैलासि तुतारी । रक्त काढूनि वासना पुरी । करिती आपुली ॥९४॥ 

 

देवाचिया नांवाखाली । कांही देतात जीव बळी । बंद करावी प्रथा असली । भावना सुधारोनि लोकांची ॥९५॥

 

कोणी घुमारे लुबाडिती । बुवा लोकांस फसविती । भ्रमिष्ट मतें व्रतें शिकविती । सावध करावें त्याठायीं ॥९६॥ 

 

परस्परांना मदत करावी । अडीअडचण ती निभवावी । सर्वांकडोनि करोनि घ्यावी । योग्य सेवा ॥९७॥

 

गांवसेवेंत आली अडचण । तिला द्यावें अग्रस्थान । आपापली जागा-जमीनहि देऊन । सोय करावी सर्वांची ॥९८॥ 

 

सर्वांकडोनि ऐसी सेवा नव्हे । तरि गरजूंना सहकार्य द्यावें । होईल तेवढें तरी करावें । निष्कपटपणें ॥९९॥

 

मुलाबाळांचें असतां लग्न । सर्वांनी जावें धावोन । पडोंचि न द्यावें ओझें, न्यून । आईवडिलांसि तयांच्या ॥१००॥

 

थोडेंथोडें सर्वांनी आणावें । वरवधूंना साहित्य द्यावें । भोजनापासोनि उरकवावें । सर्वतोपरीं ॥१०१॥

 

मांडवावरी पांच डहाळे । टाकावे हा धर्म गांवकर्‍या कळे । तैसेचि निभवावे प्रसंग सगळे । सहकार्याने ॥१०२॥

 

जैसें जैसें सहकार्य वाढे । तैसें गांव उन्नतीस चढे । न पडे विपत्तीचें कोडें । गांवीं कोणा मानवासि ॥१०३॥

 

ऐसी सेवा बिंबतां जीवनीं । कांहीच गांवीं न पडे उणी । तरीहि असावा स्वतंत्रपणीं । सेवकांचा विभाग ॥१०४॥

 

सुसज्ज असावेत गांवचे तरुण । कोणतेंहि संकट येतां ऐकून । आपुलीं सर्व कामें सोडून । धांव घ्यावी तयांनी ॥१०५॥ 

 

आग लागणें, विहिरींत पडणें । कॉलरा होणें, मूर्च्छा येणें । प्रत्येक प्रसंगीं धांवून जाणें । कर्तव्य त्यांचें ॥१०६॥

 

ऐसी ग्रामसेवेची योजना । जागृत जेथे ग्राम-सेना । तेथे स्वर्गींच्या नंदनवना । बहर येई सहजचि ॥१०७॥

 

ऐसें संघटनांनी गांव । भोगूं लागेल दिव्य वैभव । ग्रामराज्यचि सुखाची ठेव । तुकडया म्हणे ॥१०८॥ 

 

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्रस्वानुभवसंमत । ग्रामरक्षणाचा वर्णिला पंथ । अकरावा अध्याय संपूर्ण ॥१०९॥

 

॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥

 

*

अभंग

 

दया तिचें नांव भूतांचें पाळण । आणिक निर्दळण कंटकांचें ॥ 

धर्मनीतीचा हा ऐकावा वेव्हार । निवडिलें सार-असार तें ॥ 

पाप त्याचें नांव न विचारितां नीत । भलतेंचि उन्मत करी सदा ॥ 

तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी । देवासहि आटी जन्म घेणें ॥

—श्रीसंत तुकाराम महाराज